शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०२०

नवीन उद्योगाची कल्पना

सध्या एका प्रोजेक्टच्या निमित्ताने मी वेगवेगळ्या यशस्वी लोकांबद्दल माहिती गोळा करत आहे. प्रोजेक्ट यशस्वी महाराष्ट्रीयन माणसांबद्दल आहे. तर विषय तो नाही.

विषय असा आहे की यशस्वी उद्योजकांच्या कथा गेल्या काही काळापासून सातत्याने येत आहेत, योरस्टोरी, केनफोलियोज, आन्त्रप्रनरडॉटकॉम सारख्या वेबसाइट्स नव्याजुन्या उद्योजकांच्या कथा मांडत आहेत. अनेक सेमिनार्स होत आहेत त्यात उद्योजक होऊ इच्छिणार्‍या तरुणांना मार्गदर्शन केले जात आहे. (मी असा एकही सेमिनार प्रत्यक्ष बघितलेला नसल्याने अशा सेमिनार्समध्ये नेमके काय मार्गदर्शन होते हे माहित नाही) या सर्व माहितीच्या प्रदानात एक गोष्ट जाणवली, कदाचित सेमिनार्समध्येही तेच होत असावे. ती अशी की नवउद्योजकांना (ज्यांची कंपनी, फर्म अजून उभी राहायची आहे) यशस्वी लोकांच्या कथा केवळ सांगितल्या जातात. ते कसे कचर्‍यात होते आज कसे राजमहालात आहेत, कशी छोटी कामे करायचे, आज कसे हजारो कोटीचा व्यवसाय करत आहेत. ऑनलाइन कंपन्यांनी कसे एक वर्षात, दोन वर्षात अमुक इतक्या कोटींचे वॅल्युएशन मिळवले इत्यादी, इत्यादी.

हे जर मार्गदर्शन असेल तर या लोकांच्या मार्गदर्शनाच्या व्याख्येत गडबड आहे असे मला वाटते. आजवर जे यशस्वी झालेत, झुकरबर्ग, गेट्स, जॉब्स, मित्तल, जॅक मा, म्हणजे आज टॉप १०० श्रीमंत माणसे ज्यातली खरंच रॅग्स टु रिचेस झाली आहेत अशा उद्योजकांनी खरेच या प्रकारे मार्गदर्शन घेतले असेल काय? या लोकांनी कोणाच्या कथांमधून स्फूर्ती घेतली असेल? असे प्रश्न मला पडतात. अशा सेमिनार्समधून किती लोक यशस्वी उद्योजक झालेत? नेमका काय फरक पडलाय ही सेमिनार अटेन्ड करणार्‍यांमध्ये?

यशस्वींच्या कथा सांगणारे केवळ कल्पनेवर सर्व फोकस करतात, ती आयडिया कशी भारी आहे, कशी लोकांचे प्रश्न सोडवते, वगैरे वगैरे. हे वरवरचे आहे. खरेतर जर ह्या कथा इतकंच सांगणार असतील तर त्या फक्त त्यांच्या बिझनेसची पेड जाहिरात आहेत असे समजावे. अशा जाहिरातींचे दोन मुख्य उद्दिष्टं असतात, एक तर टेकसॅव्ही यंगर जनरेशनपर्यंत सहज पोचता येते, दुसरा अर्थातच इन्वेस्टर्सच्या नजरेत येण्याचे चान्सेस वाढतात. असे असेल तर या कथांना मनोरंजनाशिवाय काहीही किंमत नाही. उदाहरणार्थ, ओला किंवा उबेर यांच्या कंपनीवॅल्युएशनबद्दल दर तिसर्‍या दिवशी आकडेवारी आपण बघतो, कशी एकही कॅब मालकीची नसतांना जगातली सर्वात मोठी पब्लिक ट्रान्सपोर्ट कंपनी उभी राहीली याबद्दल कौतुक ऐकतो. नव उद्योजकाला यातून काय मार्गदर्शन, इन्स्पिरेशन मिळतं? दिवास्वप्नांचे शेखचिल्लीपण मिळू शकतं फारतर...

अशा कथांनी खरे तर हे सांगितले पाहिजे की आयडिया ते एक्झीक्युशन ते सक्सेस यापर्यंतचा प्रवास, त्यातले धोके, अडचणी, त्यावर कशी मात केल्या गेली, कॅशफ्लोचा प्रश्न कसा सोडवला, सॉफ्टवेअर्स कशी तयार केलीत, नोकरी करायला माणसे कशी मिळवली, त्यांच्यासाठी पगार कुठून जमवला, आपली कल्पना ग्राहकांना, वेन्डर्सना कशी पीच केली, कोणत्या क्यू पॉइन्ट्स वर वेन्डर्स किंवा स्टेकहोल्डर्स सहभागी व्हायला तयार झाले, फायनान्शियल्स कसे सांभाळले, जाहिराती कशा केल्या, इन्वेस्टर्सला कसे भेटलात, काय डिस्कशन्स झालीत, होतात. एक ना अनेक, असंख्य प्रश्न असतात एक उद्योग उभारायचा म्हटला तर. दिसायला (खरेतर दाखवायला) एक कंप्युटर आणि इन्टरनेट कनेक्शन एवढ्याच भांडवलावर कंपन्या उभ्या राहतात असे दिसते. पण हे खरे आहे का? ओयो हॉटेल्स इतक्या शहरांमध्ये प्रत्येक हॉटेल पर्यंत कसं पोचले असेल?

हे प्रश्न पडायचे कारण असे की मी बघतोय अनेक तरुण कल्पना शोधण्यात वेळ घालवत आहेत, पैसे घालवत आहेत. यशस्वी लोकांपासून प्रेरणा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पण एक्झिक्युशन ची वेळ आली की स्वप्नांच्या ठिकर्‍या उडतात. तिथे कोणतेही मार्गदर्शन उपलब्ध नसते. ज्याचे त्यालाच निभावून न्यायला लागते. उद्योगाच जग म्हणजे जंगलचा कायदा असतो. तिथे स्वप्नाळू लोकांचे काहीच काम नाही. मी पैसे टाकणार, किंवा आयडिया काढणार आणि उद्योग आपोआप उभा राहील असे समजणारे खूप नग रोज भेटतात. बायस तोडावे लागतात, आउट ऑफ बॉक्स विचार करावा लागतोच.

नवीन उद्योगाची कल्पना, तिचे महत्त्व फारतर १ टक्का असावे. ९९ टक्के महत्त्व हे यशस्वी अंमलबजावणीचेच असते. कारण दिवसाला माझ्या डोक्यात शंभर युनिक कल्पना येत असतात. पण त्यातली एक कल्पना जरी राबवायची म्हटली तर शंभर महिने लागू शकतील ती प्रत्यक्षात यायला. किंवा इतके महिने खपून ती येईलच असेही नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा