शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०२०

गोलसेटींग


बिझनेसमध्ये, आयुष्यामध्ये गोलसेटींगची, आपले ध्येय ठरवण्याची पद्धत.

मी बर्याच मोटीवेशनल सेमिनारमध्ये ऐकलंय, आन्त्रप्रोन्यरशिप डेवलपमेंट सेमिनारमध्ये ऐकलंय, बिझनेस कॉन्फरंसेसमध्ये मोठमोठ्या स्पिकर्सना ऐकलंय. ते बसलेल्या तमाम लोकांना विचारत असतात. गोल सेटींग हा एक महत्त्वाचा टॉपिक असतोच असतो. ते विचारतात, "तुमच्या आयुष्यातले गोल काय आहे? ध्येय काय आहे? तुम्हाला काय मिळवायचे आहे आयुष्यात?" ऐंशी टक्के लोकांनी खरेच असे काही ध्येय वगैरे ठेवलेले नसते. आपले भारतीय मानस ठेविले अनंते तैसेचि राहावे च्या संस्कारातले, त्यांचीही काही चूक नाही. अनेकांचे बिझनेस साईकृपेने, समर्थकृपेने वगैरे वगैरे वाढत असतात. चालत असतात. काही मिळवायचे ध्येय ठरवून घेतले तर त्यामागे आणखी धावपळ कोण करत बसेल, आताच नाकातोंडातून धूर निघतोय तो कमी आहे का?

मग स्पिकर जबरदस्ती लोकांना आपले गोल त्यांच्याकडच्या वहीत, कागदावर लिहायला लावतो. आत्ताच्या आत्ता लिहा, काय हवंय आयुष्याकडून तुम्हाला.... लोक लिहितात. काही स्पिकर एक एकाला उठवून विचारतात, तुमचे काय स्वप्न आहे, काय ध्येय आहे?

लोकही लिहितात, उत्तरेही देतात. कोणी म्हणतं मला १०० कोटी रुपये कमवायचेत, कोणी म्हणतं ५०० कोटी रुपये , कोणी हजार कोटी म्हणतं, कोणी आडदांडपणे दहा हजार कोटी रुपये बोलून मोकळं होतं. कोणाला मर्सिडिज घ्यायची असते, कोणाला बंगले-फार्महाउस हवं असतं. सर्वसाधारणपणे सगळ्यांना श्रीमंत व्हायचं असतं. श्रीमंत झालं की सगळ्या सुखसोयी उपभोगता येतील, निश्चिंतपणे. म्हणजे खरा गोल असतो तो निश्चिंतपणे जगण्याचाच. त्याला लागणारे पैसे मात्र प्रत्येकजण आपआपल्या बौद्धिक, सामाजिक, आजुबाजूच्या वातावरण, संस्काराच्या, शिक्षणाच्या वकुबानुसार ठरवत असतो. प्रत्येकाची स्वप्नं त्या 'निश्चिंतपणे आयुष्यसुख मनमुराद लुटण्या'भोवती गुंफलेली असतात. सर्व सुखसोयी हव्या असतात, सर्व भौतिक सुखं हवी असतात. त्याला पैशाची कमतरता भासायला नको.

भारतीयांच्या स्वभावातच हे गुंफलेलं आहे. गोल, ध्येय म्हटलं की केवळ पैसाच दिसतो. पैशाभोवती आयुष्य फिरतं. केवळ पैसाच ध्येय असतो. हेच कारण आहे की आपल्याकडे क्रिएटीवीटीचे प्रमाण कमी आहे. एवढ्यातच अॅपल कंम्प्युटर्सचा सहसंस्थापक स्टीव वॉजनियाकने अगदी हेच म्हटलं आहे. आपल्याकडे मुले मोठमोठ्या शिक्षणसंस्थांत शिकतात, कशासाठी तर मोठ्या हुद्द्यावर नोकरी मिळेल, बुडाखाली मर्सिडिज येईल, चांगली बायको मिळेल. बस! जीवनाचे ध्येय इतकेच. एवढे केले की समाजात मान सन्मान मिळतो. आयुष्यात अजून काय हवं.

त्याचमुळे आपल्याकडे फेसबुक, अॅकपल, गुगलसारख्या कंपन्या तयार होत नाहीत, एलन मस्क, स्टीव जॉब्स सारखे लोक तयार होत नाहीत.

याचे कारण आपली ध्येये चुकीच्या गोष्टींवर आधारलेली आहेत.

मी जेव्हा जेव्हा असे सेमिनार केले, मला या प्रश्नाचे कधीच उत्तर देता आले नाही, शंभर कोटी, हजार कोटी का मिळवायचे, काय गरज आहे. बरं हेच कोटीचे आकडे ध्येयाच्या कॉलममध्ये लिहून मिळणार काय हा संभ्रम होता.

खरोखर ध्येयं ठरवायची असतील तर ती पैशाला केंद्रीत करुन नव्हे तर जगातल्या कोणत्यातरी समस्येला दूर करण्याचे ध्येय बाळगले पाहिजे. जगातल्या हजारो, लाखो लोकांचे जीवन आपण बदलू शकतो काय याचे ध्येय ठेवले पाहिजे. उत्तम संगणक बनवीन, उत्तम कार बनवीन, उत्तमोत्तम सर्विस देईन, उत्तमोत्तम उपचार करेन, उपचाराच्या नव्या व स्वस्त पद्धती शोधून काढेन. आजच्या जगात जे जे काही लोक करत आहेत ते ते अधिक सोपे, स्वस्त व वेगवान कसे होऊ शकते ह्याबद्दल विचार करुन त्यातले एखादे काम ठरवून घेऊन त्यात जगातले सर्वोत्तम सोल्युशन निर्माण करणे हे ध्येय हवे असते. कालपेक्षा आज अधिक लोक माझी सर्विस वापरतात का? कालपेक्षा आज अधिक लोक माझी कार वापरतात का? कालपेक्षा आज अधिक लोक माझी उत्पादने वापरत आहेत का? नसतील तर त्याची कारणे शोधून त्यावर प्रगती करत जाणे हे ध्येय हवे.....

अशी ध्येये असतील तर पैसा धो धो येतो. पैसा हे बायप्रॉडक्ट आहे. आपले उत्पादन सेवा विकल्या गेल्या तर पैसा मिळतोच. पण आपले उत्पादन-सेवा जर सर्वोत्तम नसतील, काही कामाच्या नसतील तर निव्वळ शंभर कोटी, हजार कोटींचे मनातल्या मनात इमले बांधून कोणती ध्येये सिद्ध होणार आहेत? निश्चिंतपणे जगणे हे उद्योजकाचे ध्येय नसावे, त्याच्या ग्राहकांनी निश्चिंतपणे जगावे हे त्याचे ध्येय असले पाहिजे. मग त्याचे ग्राहकच तो उद्योजक निश्चिंतपणे जगेल याची काळजी घेतात.

सोच बदलो.... ध्येय को परखो. पैसा छोडो. दुनिया बदलो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा