काही ठिकाणी वाचलं की नास्तिक, पुरोगामी मंडळींना समाजाची नस ओळखता येत
नाही. त्यांना समाजमनाशी जुळवून घेता येत नाही, समरस होता येत नाही.
ज्यांना समाजाचं मन ओळखून हात घालता येतो ती माणसं समाजाला जास्त जवळची
वाटतात. त्यामुळे त्यांची लोकप्रियता समाजात जास्त वाढली आहे. लोक त्यांना
जास्त मानतात. पुरोगामी लोक धर्माच्या विरोधात असतात त्यामुळे समाजाला आवडत
नाहीत, समाज त्यांना स्विकारत नाहीत अशा स्वरुपाचे हे
आर्ग्युमेंट आहे. थोडक्यात काय तर समाजात स्विकारले जायचे असेल तर
पुरोगामी-समाजवादी लोकांनी समाजाचे लांगुलचालन करावं. म्हणजेच
समाजमान्यतेपुढे लोटांगण घालावे, अन्यथा गप्प बसावे. "You are not welcome
here anymore" असे पुरोगामी लोकांना सुनावण्याची ही एक वेगळी पद्धत आहे.
खरोखरच ज्याला थोडीफार समज असेल त्याला हे नक्की समजेल की समाज प्रबोधन हे
काही सुखाने फुलांच्या गादीवर बसून गोडगोड, लोकांना आवडतील अशी भाषणं करणे
नसतं. समाजप्रबोधन ही काट्याकुट्याची वाट आहे, समाजाला रसातळाला नेणार्या
प्रस्थापित मान्यता आणि पाखंडी अधिकार्यांना विरोध करुन जनतेला पुढे
न्यायचे असते.
समाज प्रबोधन म्हणजे मुळातच जे समाजाला पटत नाही,
पण स्वीकारणं गरजेचे आहे ते कडूगोड जमेल तसे मांडणे असते. कोणताही समाज
त्याचं सहज स्वागत करत नसतो...
धार्मिक प्रवचन, बुवाबाजी, भाषण,
कीर्तन करणाऱ्या लोकांनी समाजाचे लांगुलचालन केलं म्हणून त्यांना समाज
डोक्यावर घेऊन नाचतो आहे. समाज जिकडे वळतो तिकडच्या तोंडाला जाऊन हे उभे
राहतात. कोणत्या वाक्यावर पुढ्यात बसलेले लोक जास्त मान डोलावतात, कोणत्या
वाक्यावर जास्त हशा पिकतो, कोणत्या वाक्यावर सहमती मिळते ह्या तद्दन
व्यावहारिक दृष्टीकोनातून ही किर्तने-प्रवचने घडत असतात. कारण त्यावरच
टीआरपी असतो. टीआरपीवर समाजमान्यता आणि ओघानेच पैसाही मिळतो. या सर्व
व्यवहाराचा अध्यात्माशी-धर्माशी काडीचाही संबंध नाही.
खरेखुरे
अध्यात्म, खराखुरा धर्म ह्या समाजाला झेपतच नाही. हजारो वर्षे झाली. इथे
शेकडो संत होऊन गेले त्यांनी आपल्या पध्दतीने समाजाला सोप्यात सोप्या
मार्गाने अध्यात्म सांगून मोक्षाचा मार्ग सांगितला आहे. काहीही फरक पडला
नाही. लोक त्यांना डोक्यावर घेतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाची माती करतात.
कारण खरं अध्यात्म स्वीकारणे महाकर्मकठीण असते. हे सर्व संतांच्या लक्षात
आले म्हणून नामसंकिर्तन हा ध्यानाचा अतिशय सोपा मार्ग वारकरी संप्रदायाच्या
माध्यमातून पुढे आला.
नाम संकीर्तन साधन पै सोपे । जळतील पापे जन्मांतरीची ।
न लगे सायास जावे वनातरा । सुखी येती घरा नारायणा ॥धृ॥
ठाईच बैसोनी करा एक चित्त । आवडी अनंत आळवावा ॥१॥
रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा । मंत्र हा जपावा सर्व काळ ॥२॥
तुका म्हणे सोपे आहे सर्वाहूनी । शहाणा तो धनी येतो तेथे ॥३॥
जगातला प्रत्येक जीव मो़क्षाच्या रोखाने मार्गक्रमण करत असतो.
अध्यात्ममार्गात प्रत्येक मनुष्यप्राण्याची इयत्ता वेगवेगळी आहे. प्रत्येक
जण वेगवेगळ्या पायरीवर असून पुढे जाण्यासाठी मार्ग शोधत असतो. शेकडो
प्रकारच्या साधना आहेत. काही कठिण आहेत, काही सोप्या आहेत. काही लोकांना
देवपुजा, कर्मकांड हा मार्ग योग्य वाटतो. तर काही लोक देवपुजा, कर्मकांड,
ईश्वर संकल्पना ह्यातून पुढे निघून गेलेले असतात. मोक्ष मिळवण्याआधीच्या
पायर्यासुद्धा प्रचंड कठीण असतात. अनेक संतांनी प्रयोग करुन ईश्वर कसा
प्राप्त करावा ह्याच्या पद्धती शोधून काढल्या. जेव्हा त्यांना
इश्वरप्राप्ती झाली तेव्हा त्यांना कळले की ईश्वर वगैरे काहीही नसते, आपण
स्वतःच ईश्वर झालो आहोत. ज्या त्या संतांच्या अनुभूती, आकलन, क्षमता आणि
संस्कृतीनुसार त्यांनी त्यांनी आपण स्वतः ईश्वर झाल्याचे सांगितले आहे.
खुद्द तुकाराम महाराज म्हणतात - "देव पाहावया गेलो । तेथे देवचि होवून ठेलो
॥". ज्ञानेश्वर महाराज म्हणतात "अरे अरे ज्ञाना झालासी पावन । तुझें तुज
ध्यान कळों आलें ।। तुझा तूंचि देव तुझा तूंचि भाव । फिटला संदेह अन्यतत्वी
।।".
ह्या सर्व महाराष्ट्रीय संतांनी विठ्ठलाला दैवत मानलेले
आहे. यज्ञ-याग-पूजा सारखी कर्मकांडे सोडून देऊन केवळ नामसंकिर्तनातून
देवप्राप्ती-इश्वरप्राप्ती-मोक्षप्राप्ती होऊ शकते हा सोपा मार्ग,
भक्तीमार्ग त्यांनी जनतेला सांगितला आहे. हे त्या काळातही क्रांतिकारकच
होते. हे पुरोगामी वागणेच होते. संतांसाठी हा मार्ग काही सोपा नव्हता.
कोणालाही लगेच सर्व जनतेने डोक्यावर घेतलेले नाही. परंतु हळूहळू काही
लोकांना त्यांच्या सुचवलेल्या मार्गाने मानसिक शांती मिळू लागली. व्यक्तिगत
आयुष्यात स्थैर्य येऊ लागले. (जे कोणत्याही ध्यानाच्या पद्धतीने साध्य होऊ
शकते, नामसंकिर्तन ही सुद्धा एक ध्यानपद्धती आहे) काही लोकांचे पाहून मग
अधिक लोकांनी त्याप्रमाणे वागणे सुरु केले. हळूहळू जनतेने अध्यात्माचा
मार्ग सोडून, त्याचा संदेश देणार्या या संतांनाच पूजणे-भजणे सुरु केले.
कारण बहुसंख्य लोकांना साधनेपेक्षा साधनेच्या आडंबरात जास्त रस असतो.
अभ्यास करुन परिक्षा पास करण्यापेक्षा कॉपी करुन सर्टीफिकेट मिळवण्यात जसा
रस असतो तसेच इथेही. मग जे व्हायचे तेच होते. खरी मानसिक शांती मिळवायचे
सोडून, आम्ही कसे वारकरी-विठ्ठलभक्त आहोत ह्याचे ढोंग सुरु झाले. 'ज्ञानोबा
माऊली तुकाराम' असा जयघोष करतांना त्यांची खरी शिकवण सगळेच विसरले. आता जो
काही राहिला आहे तो फक्त कर्मकांडांचा ढोंगी बनाव आहे. हे हरिनाम सप्ताह,
भजने किर्तने केवळ आपण किती देवभक्त आहोत हे दाखवण्याचे कार्यक्रम आहेत.
कारण देवभक्त असल्याने समाजात जास्त मान मिळतो म्हणून सारेच स्वतःला
देवभक्त म्हणवून घेऊ लागले. ज्ञानोबा-तुकोबाचा खरा अनुयायी असलेला अशा
गर्दीपासून दूरच राहील. कारण ह्यात विठ्ठल नाही हे त्याला अचूक कळलेले
असते.
ज्ञानोबा-तुकोबा खरे पुरोगामी होते. समाज जे करतो आहे
त्यावर कठोर प्रहार करणारे तुकाराम महाराज कधी समाजाच्या लांगुलचालनाच्या
नादी लागले नाहीत. कि त्यांनी कधी फिकीर केली की मी समाजाच्या विरोधात
बोललो तर लोक काय म्हणतील. लोकांनी महाराज म्हणावे, लोकांनी मान द्यावा
म्हणून ज्ञानेश्वरांनी 'ज्ञानेश्वरी' लिहिली नव्हती. संत एकनाथ, संत
नामदेव, संत चोखामेळा, संत जनाबाई ह्यांनी समाजाने आम्हाला चांगले म्हणावे
म्हणून कोणत्याही पद्धतीने समाजमनाचा अंदाज घेऊन, त्यांचे मनोरंजन
करण्यासाठी आपले साहित्य प्रसवले नाही.
हे सर्व संत लोकमान्यता,
लोकप्रियता, लोकाभिमुखता ह्या सर्वांच्या पलिकडे गेलेले होते. लोकांच्या
मार्गाने जाण्यापेक्षा लोकांना आपल्या मार्गावर आणण्यास भाग पाडणारे हे
सर्व महात्मे होते. माझे अभंग आवडतील का म्हणून कोणी अभंग लिहित नव्हते. ती
अंतरीची जाण होती, तो दिव्य अनुभव होता, स्वतःला झालेली परमात्म्याची
प्राप्ती कोण्या शब्दातून कसं सांगू अशी बालसुलभ भावना होती. मला झाली तशी
इतरांनाही होऊ देत असा मैत्रभाव होता. पसायदानाचा अर्थ हाच तर आहे.
"दुरितांचे तिमिर जावो |विश्व स्वधर्मसूर्ये पाहो | जो जे वांछील तो ते
लाहो |प्राणिजात |" ह्या ओवीत ज्ञानेश्वर जो स्वधर्म सांगत आहेत तो काही
हिंदु-जैन-बौद्ध-इस्लाम धर्म नव्हे. प्रत्येक जीवाचा स्वतःचा धर्म आहे.
त्याचे भान त्याला येऊ देत अशी ही प्रार्थना आहे. भागवतधर्म म्हणजे ह्या
सर्व आचारविचारांत, भक्तीमार्गात-नामसंकिर्तनात विश्वास ठेवणारे लोक होत.
पण आता अभंगाच्या अर्थाची अनुभूती न घेता टाळ-मृदूंग कुटत संध्याकाळ साजरी
करणार्यांनी ह्या धर्माला हायजॅक केले आहे.
नामसंकिर्तन ही
समाधीवस्था मिळवण्याचा मार्ग आहे. नामसंकिर्तनाकडे लोकांनी वळावे,
त्यासाठीची पूर्वतयारी कशी करावी ह्यासाठी किर्तन असते. संतांनी काय
सांगितले त्याचे सोप्या भाषेत निरुपण करण्याचे काम किर्तनकाराचे असते.
त्यासाठी अभ्यास आणि पाठांतरापेक्षा अनुभूती फार महत्त्वाची असते. ही
अनुभूती कोणताही ट्रेनिंग कोर्स करुन येत नाही. अनूभूती असेल तर पाठांतर
आणि अभ्यासाची गरज पडत नाही. ते आपसूकच अंतरीतून सहज येते. लोकांचे मनोरंजन
किंवा समाजाचे प्रबोधन करण्यासाठी किर्तन नसते. त्यासाठी तमाशा आहे,
गणगवळण आहे, बतावणी आहे. त्यातून उत्तम मनोरंजन आणि जनजागृती होऊ शकते.
देशाच्या राजकारणात काय चालू आहे, ते योग्य आहे की अयोग्य आहे, ३७० चांगले
झाले, हिंदुराष्ट्र व्हायला पाहिजे, हिंदूंनी जागृत व्हायला पाहिजे अशा
स्वरुपाच्या राजकिय प्रचाराची किर्तन ही जागा नव्हे. भागवतधर्म 'वसुधैव
कुटूंबकम्' ह्या संकल्पनेला मानणारे आहे. वर्ल्ड-सिटीझन, जगाचा नागरिक ही
संकल्पना भागवतधर्म मानतो. त्याला हे हिंदु-मुस्लिम, भारत-पाकिस्तान,
जातपात असल्या गोष्टींमध्ये पडायची गरज नाही.
लोकांना आपल्या
भागात हरिनाम सप्ताह करुन अवडंबर करायची भारी खोड असते. त्यामुळे
किर्तनकारांची डिमांड वाढली. आता डिमांड म्हटली की जशी मागणी तसा पुरवठा
होऊ लागला. अनूभुतीसंपन्न निरुपण करणारे किर्तनकार नाहीतच अशातला भाग नाही.
पण ते प्रसिद्ध नाहीत ह्यातच काय ते ओळखा. ज्या प्रकारची किर्तने लोकप्रिय
होत आहेत त्यावरुन हेच लक्षात येते की खरा भागवतधर्म लोप पावत चालला आहे.
इथे फक्त इंदुरिकरच एकटे दोषी नाहीत. अनेक नवे-जुने कलाकार आहेत. त्यांना
प्रोत्साहन देणारा सर्व समाज आहे. ह्या सर्व लोकांनी काहीतरी वेगळेच
क्लबटाईप सुरु केले आहे. तोंडी लावण्यापुरते देवाचे नाव घेतले, अभंग-ओव्या
पुटपुटल्या की झाले. हे किर्तनकार नव्हेत, कलाकार आहेत. लहान मुले जशी
घरातली भाजी-पोळी खायचा कंटाळा करतात पण कुरकुरे चटाचट खातात तसे लोकांना
या कुरकुरे किर्तनांचे व्यसन लागले आहे. त्यालाच हे पूर्णब्रह्म समजत आहेत
हे आणखी वाईट.
मागच्या काही दिवसांत इंदुरीकरांच्या वक्तव्यांवरुन
झालेल्या गदारोळात मला एक गोष्ट खटकली. ती म्हणजे इंदुरीकरांनी काय
वक्तव्ये केली ती केलीत, पण त्या वक्तव्यांचा अर्थ काय होतो हे
समजून-उमजूनही बहुसंख्य लोक त्या वक्तव्यांची पाठराखण करत होते. हे पाठराखण
करणारे लोक भागवतधर्माला खड्ड्यात घालत आहेत असे माझे मत आहे. ह्यांना
खरेच भक्तीमार्ग, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज आणि संतसाहित्य ह्याचे
कसलेही ज्ञान नाही हे कळून येत आहे. अन्यथा इंदुरीकरांना खूप आधीच विरोध
झाला असता.
पुरोगामींना जसे हिंदूद्वेषी म्हणून आधीच रंगवण्यात
आलेले आहे, त्याच स्वरुपात इंदुरीकरांवर पुरोगामी लोक टिका करत आहेत म्हणून
आताही झालेले दिसून आले. पुरोगामी-नास्तिकांना हिंदूंचे काहीच आवडत नाहीत
म्हणून ते असले वाद उकरुन काढतात आणि आमच्या श्रद्धास्थानांची बदनामी करतात
असे विचार इंदुरीकर-भक्तांकडून आले आहेत. हे आश्चर्यकारक नसले तरी खेदजनक
नक्कीच आहे. पुरोगामी सांप्रत समाजाला गोड वाटणार्या विषापासून परावृत्त
करण्याचा प्रयत्न करणारे असतात. त्यांनी समाजाला आवडेल तसे करणे शक्यच
नसते. हे संतांच्या पुरोगामी आचरणांतून सहज कळून येते.
भागवतधर्माला ग्लानी आली आहे. लवकरच हे मळभ दूर हटून विश्वाला स्वधर्माचा सूर्य पाहण्याची संधी लाभो असा मैत्रभाव व्यक्त करतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा