शुक्रवार, १५ मार्च, २०१९

पॅनफिलोबचे शूर २८ सैनिक

पॅनफिलोबचे शूर २८ सैनिक



दुसर्‍या महायुद्धाच्या काळातली ही घटना. कशी उलगडत जाते बघा.

1941 च्या नोव्हेंबरात जर्मनीचे सैन्य मॉस्कोवर चाल करुन जात होते. दरम्यानच्या प्रवासात त्यांना जागोजागी रशियन सैन्याकडून प्रतिकार झाला. अनेक ठिकाणी जर्मनांनी तो मोडून काढला. परंतु एका तगड्या जर्मन युनिटला रशियन सैनिकांच्या ३० जणांच्या एका छोट्याशा गटाने फारच कडवी झुंज दिली. ह्या ३० रशियन सैनिकांसमोर ५४ दमदार जर्मन टँकचे एक मोठे युनिट चालून येत होते. आपले ठाणे सोडायचे नाही व जर्मनांना जमेल तसा प्रतिकार करायचाच असा हा वीर बहादूर रक्षणकर्त्यांनी निर्णय केला. का तर? आपली पोस्ट सोडून जायचे कुठे? मॉस्को तर अगदी आपल्यामागेच आहे. घाबरुन पलायन करण्याचा प्रयत्न करणार्‍या दोन साथीदारांना त्यांनी स्वतःच गोळ्या घालून संपवले. जर्मनांशी टक्कर घ्यायचा पण केलेल्या हा निधड्या छातीच्या बहादूरांकडे मात्र टँक युनिटशी लढण्यायोग्य कोणतीही परिणामकारक अशी हत्यारे नव्हती. जुनाट पद्धतीच्या बंदूकी, जर्मन टँकसमोर बिलकूल कुचकामी अशा अँटीटँक रायफली आणि ग्रेनेड्स एवढीच त्यांची तयारी. परंतु मनात आपला देश, आपली माती, आपली माणसे ह्यांच्यासाठी असलेली सर्वोच्च भावना, प्रचंड प्रेम असेल तर कोणत्याही विपरित परिस्थितीत सैनिक आपले कर्तव्य पूर्ण करतोच. त्यामुळे आपल्या तुटपुंज्या सामर्थ्यासह ह्या कडव्या रशियन सोल्जरांनी जर्मन टँक युनिटवर निकराचा हल्ला केला, अंदाधुंद लढाई झाली. अजेय समजल्या जाणार्‍या जर्मन टँक्सना त्यांनी चांगलीच धूळ चारली. अठरा टँक गारद केले, अनेक जर्मन सोल्जर मारले, जखमी केले. परंतू जर्मनांच्या संख्याबळापुढे, आधुनिक हत्यारांपुढे ते २८ जण टिकू शकले नाही. तरी त्यांनी जर्मनांना सळो का पळो करुन सोडलेच. अखेर सगळ्या २८ रशियन शूरवीरांना हौतात्म्य प्राप्त झाले.

सदर बातमी रशियन वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली. सर्व रशियातून, सैनिकांमधून, जनतेतून ह्या शूर अठ्ठावीस नायकांबद्दल खूप बोलले जाऊ लागले. जर्मन आक्रमणामुळे मनोबल गमावलेल्या रशियन सैनिकांमध्ये ह्या बातमीने नव्या उत्साहाची पेरणीच जणू केली. त्यांच्या शौर्याच्या कथांनी रशियनांना  जर्मनांविरुद्ध लढण्याची प्रेरणा मिळाली. ह्या बातम्या जेव्हा रशियन आर्मीच्या वरिष्ठांच्या कानावर आल्या तेव्हा त्यांनी ह्या २८ जणांबद्दल अधिक माहिती मागवा असे आदेश निघाले. त्यांची नावे अजून कळलेली नव्हती. पॅनफिलोब नावाच्या मेजर जनरलच्या रायफल डिविजनमधले ते सैनिक होते असे कळल्यामुळे त्यांचा 'पॅनफिलोबचे २८ सैनिक' अशाच नावाने उल्लेख केला जात होता. आता जनतेत त्यांची चर्चा होऊ लागल्याने त्या सर्वांना त्यांच्या नावानिशी मरणोपरांत काही पदके वगैरे सन्मान देऊन, तसा सोहळा घडवून आणला तर त्यानिमित्ताने जनतेला, सैन्याला आणखी प्रेरणा मिळू शकेल अशी वरिष्ठांची संकल्पना होती.

आता पुढे गंमत घडते. त्या २८ नावांचा शोध घेत असतांना टप्प्याटप्प्याने असे कळत जाते की ही सर्व शौर्यगाथा सांगोवांगीची आहे. अमक्याने मला सांगितले, तमक्याने तमक्याला असे सांगितले अशा मार्गाने हा शोध जाऊ लागला. जसे जसे अधिक उत्खनन होऊ लागले तसे ह्या सर्व घटनेचे तपशीलही बदलू लागले. अखेर रशियन वरिष्ठांना ह्या घटनेची रितसर चौकशी करण्याचे आदेश द्यावे लागले. ह्या प्रकरणातले सत्य काय आहे ते त्या अधिकृत अहवालातून  पुढे आले. तर त्या दिवशी नेमके काय झाले होते?

जर्मनांच्या आक्रमणाला अनेक रशियन डिविजन्सने जागोजागी प्रतिकार केला. त्यात २८ जणांची एक तुकडी होती खरेच. त्यांची नावेही कळली. पण त्या तुकडीने वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्याप्रमाणे कोणताही पराक्रम गाजवला नव्हता. रशियन आर्मीच्याच काय तर खुद्द जर्मनांच्या त्या दिवशीच्या नोंदीं मध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात टँक नष्ट झाले किंवा त्यांच्या आक्रमणाच्या प्रवासात असे काही मोठे विघ्न आल्याचे आढळले नाही. जर्मनांनी आपले त्यादिवशीचे टार्गेट वेळेच्या आधी पूर्ण केले होते. तर ह्या २८ जणांच्या तुकडीमध्ये जे मृत समजले गेले होते त्यातले सहा जण प्रत्यक्षात जीवंत होते. त्यातला एक तर चक्क जर्मनांना सामील झाला होता आणि नंतर जर्मन पोलिसात मस्तपैकी नोकरीही करत होता. त्या नोकरीदरम्यान त्याने रशियन लोकांवर जर्मनांनी केलेल्या अत्याचारांत साथ दिली. जेव्हा जर्मनीचा पाडाव होणार आहे हे त्याला कळले तेव्हा परत फिरुन तो रशियन आर्मीत रुजू झाला. अर्थात नंतर त्याच्यावर खटला दाखल होऊन त्याला त्याच्या देशद्रोहाच्या गुन्ह्यासाठी १५ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली.

अशा तर्‍हेने पॅनफिलोबचे २८ सैनिक तर होते परंतु ते शूरवीर हुतात्मे नव्हते. सर्व पराक्रम गाथा चक्क खोटी होती आणि हे लगेच १९४८ च्या अधिकृत चौकशी अहवालात सिद्ध झाले होते. परंतु जनतेच्या मनावर ह्या नव्या बातमीचा विपरित परिणाम होऊ नये म्हणून हा अहवाल दाबून ठेवण्यात आला. जनतेला त्या शूरवीरांच्या प्रेरणादायी कथांमध्ये रमत राहू दिले गेले. 

रशियाचे अध्यक्ष पुतिन ह्यांनी रशियन जनतेला आपला शूर इतिहास कळावा आणि रशियाने कसा बलाढ्य जर्मनीवर विजय मिळवला हे कळावे ह्यासाठी ह्या कथेवर आधारित चित्रपटाला प्रोत्साहन दिले. त्या विरोधात रशियन स्टेट अर्काइव चे डायरेक्टर मिरोनेन्को यांनी असे विधान केले की "उपलब्ध कागदपत्रांनुसार ही सर्व दंतकथा आहे. असे प्रत्यक्षात काहीच घडले नव्हते. " त्यांना आता त्या पदावरुन हटवण्यात आले आहे.

रशियाच्या सांस्कृतिक मंत्र्यांच्या नुसार "जरी अशी कोणती घटना खरेच घडली नसेल, जरी असे कोणी २८ लोक प्रत्यक्षात कधी अस्तित्वातच नव्हते, तरीही ही आठवण रशियन जनतेच्या मनाचा तो हळवा आणि पवित्र कोपरा आहे. त्या पवित्र राष्ट्रप्रेमी भावनेला धक्का लावण्याचे घाणेरडे कृत्य कोणी सडक्या डोक्याचेच करु शकतत..."

दरम्यान, राष्ट्राध्यक्ष पुतिन ह्यांनी रशियन शाळांत शिकवला जाणारा इतिहास 'सुधारुन' घेतला आहे. आता ह्या इतिहासातील अनेक प्रकरणे 'पवित्र' आहेत ज्याविरुद्ध बोलणे अयोग्य असणार आहे. रशियन सरकारतर्फे तयार केलेला अधिकृत इतिहास हाच ह्यापुढे ग्राह्य धरला जावा असे सरकारचे मत आहे.

तर मंडळी, जग कोण्या टप्प्यावर येऊन पोचले आहे ते बघा. असे काही तुमच्या देशात होतांना दिसते आहे का?



मंगळवार, १२ मार्च, २०१९

दुसऱ्या महायुद्धातले जपानी सैन्याचे युद्धगुन्हे

(पूर्वसूचना: मानसिक त्रास होईल असे मानवी अत्याचारांचे दाखले प्रस्तुत लेखात आहेत. आपल्या जबाबदारीवर लेख वाचावा.)


युद्धावर आधारित चित्रपटांबद्दल एक लेख काल वाचला, त्यात एका जपानी animation चित्रपटाचे नाव वाचले कि सर्वात भयंकर युद्धपट आहे. "Grave of the Fireflies" तो चित्रपट काल बघितला. दोन दिवस आधीच जपानवर झालेल्या अणुबॉम्ब हल्ल्याचा माहितीपट बघितलेला. तेव्हापासून डोक्यात हिरोशिमा नागासाकीच्या सामान्य लोकांवर विनाकारण काय काय अत्याचार झाले ते घोळत होते... ग्रेव्ह्ज बद्दल माहिती घेतांना बेअरफुट जेन बद्दल कळले. त्या बॉम्ब हल्ल्यातून बचावलेल्या एक कार्टूनचित्रकाराच्या स्वत:च्या अनुभवावर आधारित बेअरफुट जेन ह्या मालिकेतला बॉम्बहल्ला असलेला भाग बघितला. त्यातले animation भयंकर अंगावर आले. अमेरिकेने युद्धखोर जपान्यांशी असलेली खुन्नस काढायला इतक्या अमानवी पातळीवर जायची काय गरज होती असे खूप वाटू लागले...

मग कुठेसे वाचलेले आठवले कि जपानी युध्वज्वराने वेडे झाले होते. हिरोशिमा नागासाकी झालं नसते तर जपान्यांनी युद्धविराम घेतलाच नसता. मग जरा जपान्यांनी नेमके असे केले तरी काय म्हणून शोध घेतला तर जो इतिहास पुढे आला तो अंगावर काटा आणणारा होता.

१९३७ ते १९४५ च्या अवघ्या सात वर्षांच्या काळात जपानी सेनेने अंदाजे ३० लाख ते एक कोटी माणसे मारल्याची माहिती मिळते. दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडात जग जिंकण्याचे वेड जपान्यांवर स्वार झालेले, आपला वंश हा जगावर राज्य करण्यासाठी देवानेच पाठवला आहे अशी त्यांची धारणा होती. आपण सोडून इतर लोक हे माणसेच नव्हे तर जनावरे आहेत अशी त्यांची समजूत होती. युद्ध हे जरी एकमेकांचा जीव घेण्यासाठी लढले जात असले तरी त्यालाही काहीतरी नियम आहेत. जपानी सैन्याला असे काही अंतरराष्ट्रीय युद्धनियम पाळायची त्यांना गरज आहे असे वाटले नाही. फसवणूक, खोटेपणा, आपण दिलेला शब्द सर्रास मोडणे हे जणू त्यांचे स्वभावगुण. माणसे मारायची त्यांना प्रचंड आवड होती. लढाईत आपल्यावर चाल करून आलेल्या किंवा आपण चाल करून जात असलेल्या शस्त्रधारी सैनिकांचे प्राण घेणे ही युद्धातली सर्वसाधारण परिस्थिती. परंतु जपानी सैनिक मजा म्हणून माणसे मारायची. युद्धकैद्यांकडून माहिती काढण्यासाठी एक एक अमानुष छळाचे प्रकार त्यांनी शोधले. त्यांनी अ-सैनिक/निशस्त्र/युद्धकैदी/स्त्रिया/वृद्ध/बालके कोणालाही जिवंत सोडले नाही. एका घटनेत एक सैनिक बलात्कार करण्यासाठी एका गर्भवती स्त्रीच्या मागे लागला. तिचा विरोध न आवडल्याने त्याने आपल्या बंदुकीच्या संगीनीने तिचे पोट फाडले. तीच संगीन तिच्या पोटातल्या बाळाला खुपसून बाहेर काढले, संगिनीच्या टोकावर त्या बाळाला त्याच्या मातेसमोर नाचवू लागला. दुसऱ्या घटनेत आईच्या विरोधाचा राग आल्याने भात उकळत शिजत असलेल्या मोठ्या भांड्यात बाळाला टाकून वरून झाकण लावून टाकले.

रेबीज झालेल्या चावऱ्या कुत्र्यांसारखे जपानी सैनिक बेभान होते. किंवा त्यांची ती जणू संस्कृती असावी असे वागत होते. पकडलेल्या युद्धकैद्यांपैकी धष्टपुष्ट तरुण निवडावे. मग त्यांना मारून त्यांचे तुकडे तुकडे करून खाणे हे त्यांच्यासाठी नित्याचे होते. हे कमी होते कि काय, क्रोर्याची कोणतीही सीमा जणू माहितीच नाही असे वर्तन जपानी सैनिक करत होते. जिवंत माणसाच्या शरीरावरचे अवयव त्याला जिवंत ठेवून कापून खात. एका भारतीय युद्धकैद्याच्या जबानीनुसार त्याच्या समक्ष त्याने काही सैनिकांना एका युद्धकैद्याला जिवंत असतांना एक एक अवयव कापून काढून स्वत:च्या बराकीत शिजवून खायला घेऊन जातांना लपून पाहिले.

जपानी सैन्याने चीनच्या नानजिंग ह्या शहरावर ताबा मिळवला आणि जगाच्या इतिहासात कधी घडले नसेल इतके अमानवी हत्याकांड घडवले. अवघ्या सहा आठवड्यात त्यांनी नानजिंग शहरातल्या तीन लाख लोकांना मारून टाकले अशी माहिती मिळते. चीनी लोकांना जपानी सैनिक माणूस मानतच नव्हते. आपण चीन्यांचे तारणहार असून त्यांना मारून खरेतर त्यांना मुक्तीच देत आहोत अशी त्यांची धारणा होती. कोणत्याही वयाच्या स्त्रियांवर बलात्कार करणे, माजेखातर माणसे मारणे हा नानजिंगमध्ये सर्वसामान्य जपानी सैनिकाचा दिनक्रम होता. आपल्या तलवारीने आपण किती लोकांच्या माना कापू शकतो ह्याची दोन सैनिकांची चक्क पैज लागते. आणि त्या निष्पाप लोकांचे प्राण घेतांना फोटो काढून जपानी वृत्तपत्रात त्यांचे आकडे छापून येतात.नानजिंग शहरावर जो अत्याचार जपान्यांनी केला त्या सर्व घटनांचे जसेच्या तसे सादरीकरण करणारा एक चित्रपट Black Sun: The Nanking Massacre (1995) काल रात्री बघितला. युट्युब वर आहे. तो चित्रपट बघितल्यावर सुन्न व्हायला होते. मानवाच्या हातून होणाऱ्या कृरतेचे प्रमाण ठरवायचे असेल तर जपानी सैन्याचे अत्याचार हे सर्वोच्च मानक असले पाहिजे. आपण वारंवार केवळ हिटलरबद्दल ऐकतो. पण हिटलरलाही लाजवेल असे कृत्य जपान्यांच्या नावावर आहे. हिटलर ने ज्यूंची कत्तल करण्याला त्यांच्याबद्दल असलेली घृणा, तिरस्कार होता, ज्याची ज्यूंना संपवून पूर्तता करणे हिटलरचे धोरण होते. जपान्यांना असे काही धोरण, धारणा, काहीच नव्हते. आपण जसे टोमाटो, काकडी चिरतो तसे ती रोज मजा म्हणून माणसे कापत होती. वैद्यकीय संशोधनासाठी थेट माणसे वापरली जात होती. प्रयोगांचे परिणाम अचूक मिळावे म्हणून भूल न देता शस्त्रक्रिया किंवा अन्य जीवघेणे प्रयोग केले जात असत. बर्फाळ हवेत हिमदंश होतो, त्यावर इलाज शोधण्यासाठी जपानी डॉक्टर युध्कैद्याना वापरायचे. त्यांना उघड्यावर कपडे न घालता उभे ठेवायचे, त्यांचे हात पाण्यात बुडवून ओले करायचे. अतिथंडीने गोठून हात कडक झाला कि तो तसाच झाडाची फांदी तोडल्यासारखा तोडायचे, असे करत करत खांद्यापर्यंत तोडायचे. मग पाय अशाच पद्धतीने तोडायचे. केवळ धड आणि डोके शिल्लक राहिलेला जिवंत माणूस मग असाच मरायला सोडून द्यायचे. अधिक विस्तृत वाचायचे असल्यास विकीपेज: https://en.wikipedia.org/wiki/Japanese_war_crimes

अंदमान निकोबार मध्ये अल्पकाळासाठीचा अंमल सोडता जपान्यांचा आपल्या सुदैवाने भारतावर हल्ला झाला नाही व भारत त्यांच्या अत्याचारापासून बचावले गेले. तरी अंदमान येथे भारतीय युद्धकैद्यांना जपानी पद्धतीची वागणूक मिळाली असे समजते. हा सर्व इतिहास बघता अमेरिकेने जपानवर बॉम्ब टाकले हे कृत्य योग्यच वाटते. हिरोशिमा नागासाकी झाल्यावर जपानने युद्धातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. परंतु त्यामागेही एक कथा आहे. दोन अणुबॉम्ब पडल्यावर, आणखी असे किती बॉम्ब पडू शकतात ह्याबद्दल जपानी सैन्याने युद्धकैदी असलेल्या एका अमेरिकन सैनिकाकडून माहिती काढण्याचा प्रयत्न केला. ह्यांच्या टोर्चर च्या अघोरी पद्धती माहिती असलेल्या त्या सैनिकाने गुप्त माहिती सांगायच्या नावाखाली चक्क ठोकून दिले की अमेरिकेकडे अजून शंभर अणुबॉम्ब आहेत. ते टोक्यो वर पुढचा हल्ला करणार आहेत. तेव्हा कुठे सरतेशेवटी घाबरून जपानी सैन्याने युद्धविरामाचा निर्णय घेतला. अन्यथा हे दोन बॉम्ब पडूनही जपान्यांचा अश्वमेध यज्ञ थांबलाच असता ह्याची खात्री नाही.

हिरोशिमा नागासाकी वर अणुबॉम्ब टाकून एका फटक्यात एक लाख चाळीस हजार निष्पाप मारले गेले आणि त्यासोबतच माणुसकीची हत्याही झाली, त्या सर्व निरपराध जपानी नागरिकांना दरवर्षी 6 आणि ९ ओगस्ट ला आठवणीने श्रद्धांजली वाहिली जाते. आपल्याला शाळेपासूनच ह्या हिरोशिमा नागसाकीच्या संहाराची ओळख झालेली असते. परंतु त्याला कारणीभूत असलेल्या जपान्यांच्या क्रूरतेची कधी हलकीशी जाणीव देखील होऊ दिली जात नाही. ह्यामागे सुभाषचंद्र बोस ह्यांचा जपान्यांशी असलेला संबंध कारणीभूत असावा काय? भारतीय नेत्यांपैकी आणखी कोणी जपान्यांकडे तारणहार म्हणून किंवा काट्याने काटा काढण्याचा उपाय म्हणून पाहत होते? ज्यूंवर झालेल्या अत्याचाराची आजही दर पाचव्या दिवशी उकरून काढून सतत आठवण करून दिली जात असतांना जपानी अत्याचारांना कुठे व का दडवले गेले असावे? जपानी लोकांच्या केवळ सुरम्य कष्टांच्या कथाच का ऐकू येतात?

जपान्यांनी कहर केला म्हणून अमेरिकेचा अणुहल्ला योग्य ठरतो असे माझे काहीही म्हणणे नाही. असे म्हणायचे झाले तर सुडाच्या नद्यांचे उगम शोधता शोधता मानवजातीच्या हजारो वर्षांचा इतिहास उघडून बसावे लागेल. जगातल्या कोणत्याही निरपराध, निष्पाप मनुष्याची हत्या होणे हा प्रकार अजिबात समर्थनीय नाही हे इथे नमूद करतो.

युद्धकाळात झालेल्या ह्या अमानवी अत्याचारांबद्दल जपानतर्फे वेळोवेळी अधिकृतपणे माफी मागण्यात आली आहे. जपानच्या सैन्याबद्द्ल महत्त्वाची घटनादुरुस्ती होऊन हे सैन्य केवळ बचावासाठी असेल असे ठरले. परंतु आता बरेचसे जपानी लोक असे काही अत्याचार झाले होते हे नाकारायच्या मनोवृत्तीचे होऊ लागले आहेत. आपल्या पूर्वजांनी केलेल्या अत्याचाराला नाकारणे हा एक नवीन प्रकार अनेक देशांत प्रचलित झाला आहे. ह्यातून कोणीही सुटलेले नाही. जपानमध्ये घटनादुरुस्ती होऊन बचावासाठीचे सैन्य हा उद्देश बदलून हल्ल्यासाठी सैन्याचा वापर केला जावा अशी तरतूद झाली आहे. हे समजल्यावर वाईट वाटले. जगात सर्वत्र राष्ट्रवादी आणि प्रतिगामी सरकारे येऊ घातली असतांना आपण नेमके परत शंभर वर्षापूर्वीच्या जगात तर येऊन पोचलो नाहीना अशी शंका येते.

युद्धाच्या कथा रम्य नसतात.
शौर्यगाथांच्या पात्यावरून निरपराधांचे रक्तही ठिबकत असते.


सोमवार, ४ मार्च, २०१९

संपूर्ण निखालस सत्य



परराष्ट्रनीतीमध्ये 'कोणताही देश' जे अधिकृतरित्या मांडतो ते सर्वथा खरेच असते असे नाही. नक्की काय खरे काय खोटे हे ३०-४० वर्षांनी कोणी आतल्या माणसाने काही लिहिले किंवा गुप्त कागदपत्रे खुली केली तरच माहित होते. त्यातही कागदपत्रे उपलब्ध झाली म्हणजे सत्य बाहेर आले असेही होत नाही. त्याचे विश्लेषण करावे लागते. विश्लेषण करतांना पूर्वग्रह टाळता येतीलच असे नसते. आतला माणूस असला म्हणजे तो जे बोलतो ते केवळ त्याच्याकडे असलेली माहिती असते. त्याचे अनुभव असतात. तो खरेच बोलतो असेही नसते, प्रसंग, नावे बदलली असू शकतात, त्याचाही स्वत:चा काही तात्कालिक अजेंडा असू शकतो. एखाद्या माणसाचे किंवा एका समुदायाचे अनुभव म्हणजे सत्याची खात्री नसते. कोणत्या कारवाईने काय साध्य करायचे होते व ते साध्य झाले की बिघडले हे केवळ ती कारवाई प्लान करणार्‍या व्यक्तीलाच माहित असते. अगदी एक्झिक्युट करणार्‍या टॉपच्या अधिकार्‍यालाही त्या कारवाईच्या मागचे हिडन अजेंडे माहित असतीलच असे नसते. गुप्तहेरांनादेखील आपल्याला एखाद्या कामगिरीवर पाठवले आहे ते कशासाठी ह्याचे कोणतेही स्पष्टीकरण दिले जात नसते. 'त्याच्या गरजेपुरती माहिती' असे गुप्तयोजनेत सामील असलेल्या प्रत्येकासाठीचे ब्रिद असते.

माध्यमात दिली जाणारी माहिती हीसुद्धा योजनेचा भाग असतो. माध्यमात माहिती देणे हाही कुठलातरी परिणाम घडवून आणण्याची योजना असते. माहिती दिली म्हणजे ती खरीच असते असे नाही, खोटीच असते असेही नाही. काय सांगितल्याने काय परिणाम होईल तीच, तेवढीच माहिती दिली जाते. दिल्या जाणार्‍या माहितीमागे 'जनतेला किंवा जगाला खरे काय ते सांगावे' हा उद्देश कधीच नसतो तर 'काय सांगितल्याने कोण कसा विचार करेन व काय कृती करेन' ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास असतो. सत्य शोधायचे असल्यास उपलब्ध माहितीच्या शेकडो बिंदूंना जोडत जोडत चित्र तयार करायचे असते. लहान मुलांच्या पुस्तकात जशी बिंदूंची चित्रे असतात तसे. ते चित्र पूर्ण केले तरी केवळ आभासी वाघ तयार होतो. बिंदू जोडून सत्याचे आकलन झाल्यासारखे वाटत असले तरी सत्य कधीच पूर्णपणे हातात येत नसते. हवे ते बिंदू जोडून, नको त्या बिंदूंकडे दुर्लक्ष करून वाघाच्याऐवजी माकडाचे चित्रही तयार करणे शक्य असते.

एखादी घटना का घडली, कशी घडली त्या मागे नक्की कोण आहे ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्याची सर्वसाधारण प्रोसेस रिवर्स इंजिनिअरिंग सारखी किंवा बॅकवर्ड इंटिग्रेशनसारखी आहे. ती पार 'नेहरु कारणीभूत आहेत' पासून 'मोहम्मद गझनीच्या पहिल्या स्वारी'पर्यंत जाऊ शकते. खरोखर एखाद्या घटनेची पाळेमुळे शोधून काढायची तर त्या घटनेनंतर काय परिणाम झाले, कोणाला फायदा झाला, कोणाचे नुकसान झाले ह्या प्रश्नांची उत्तरे शोधून काढणे महत्त्वाचे असते.हे फॉरवर्ड इंटीग्रेशन. शास्त्रशुद्ध इतिहासामध्ये अभ्यासाची ही पद्धत आहे. घटनेची कारणे व परिणाम दोन्हींचा परस्परावलंबी अभ्यास करावा लागतो. त्यातून एक सूत्र दिसू लागते. ते खरे असते. अर्थात ज्याला फायदा झाला तोच घटनेचा सूत्रधार असे मानणे म्हणजे एखाद्या मनुष्याचे प्रकृतीवर, भविष्यावर, होणाऱ्या परिणामांवर सर्वथैव नियंत्रण आहे हे कबूल करण्यासारखे होईल. योजना यशस्वी होतात त्याहून जास्त त्या फसतात हे लक्षात घेतले पाहिजे. फसणाऱ्या योजनांच्या परिणामांचाही वापर आपल्या फायद्यासाठी वसूल करून घेणे शक्य असते. अशा परिस्थितीत सत्य काय आहे त्यावर विश्वास ठेवणे अशक्य होऊन बसते.

जन्म आणि मृत्यू सोडल्यास 'संपूर्ण निखालस सत्य' अशी काही गोष्ट जगात अस्तित्वात नाही.

~संदीप डांगे.

बदमाश मिडीयाचा देशविघातक सापळा




'साप-मुंगुसाची लढाई दाखवतो, पुरुषाला स्त्री बनवून दाखवतो' असे म्हणून गारुडी गर्दी गोळा करतो, अर्धा तास काहीतरी इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगून हळूच ताबीज विकायला लागतो, लोकही त्याच्या संमोहित करणाऱ्या गप्पांत गंडले जाऊन पाच पाच रुपयांचा ताबीज घेऊन टाकतात. एखादा गारुडी, डोंबारी खेळ दाखवण्यापूर्वी नागदेवतेसाठी किंवा त्याच्या पेटाऱ्यात असलेल्या जागृत देवासाठी दान मागतो, दान दिले नै तर तुमच्यासोबत काहीतरी वाईट होऊ शकते अशी गर्भित धमकी देतो. लोक ह्या कचाट्यात येतात. पैसे काढून देतात.. पण तो शेवटपर्यंत पुरुषाची स्त्री झालेली दाखवत नाही कि सापाची मुंगुसाशी लढाई दाखवत नाही... अचानक खेळ गुंडाळतो, नाही तर लोक कंटाळून आपल्या कामाला लागतात. न्यूज चॅनेलवाले हेच करतात. ते गुंगवून ठेवतात. किमान अर्धातास तरी, नाही तर वीस मिनिटे तरी. तेवढ्यात दोन चार कमर्शियल ब्रेक होतात, त्यात प्रेक्षकांना कपडे धुवायचे साबण, मोरी घासायचे लिक्विड पासून छे दिन में गोरापन, बालोन्को कुदरती कालापन, दाता-हातातले ९९% किटाणू मारायची औषधे, डास पळवून लावायच्या मशीन, म्युच्युअल फंड, हेल्थ इन्शुरन्स, गाड्यामाड्यापर्यंत सगळे विकले जाते. हेच चॅनेलवाल्यांचे ताबीज विकणे, दान मागणे. हाच ह्यांचा खरा धंदा. जाहिरातीसाठी प्रेक्षक गोळा करणे हा चॅनेलचा खरा धंदा. ह्याला पत्रकारिता म्हणणे म्हणजे आगीला पाणी म्हणण्यासारखे आहे. आणि हो, 'सांप और नेवले कि लडाई' ह्या न्यूज चॅनेलवर खरोखर अशाच गारुड्याच्या पद्धतीने दाखवली आहे.

२००७ मध्ये नवीन जॉब लागण्याआधी महिनाभराचा वेळ हाती होता. गावी घरी गेलो. करायला काहीच नव्हते. मग टीव्ही बघत बसलो. फक्त न्यूजचॅनेल. दिवसाला १८ तास केवळ न्यूज बघत बसलो.. सतत सात दिवस. सगळे चॅनेल फिरायचो. सातव्या दिवशी न्यूज चॅनेल पाहणे कायमचे बंद करून टाकले... ते पागल करतात, ताबा घेतात मेंदूचा. महत्त्वाची, ज्ञानात भर टाकणारी माहिती काहीच देत नाहीत. मोजून चार ओळी दिवसभर पार्श्वसंगितासोबत वाजवत असतात. ब्रेकिंग न्यूज एक ओळीची असते. तीच दिवसभर फिरवणार, कारण ह्यांच्याकडे डीटेल्स कधीच नसतात. आठवा, ठाण्यात रेल्वेवर ब्रिज कोसळलेला तेव्हा तिथे उभ्या असलेल्या आणि तिथून रिपोर्टिंग करत असलेल्या कोणत्याही चॅनेलकडे कसलेही डीटेल्स नसतांना माईकवाल्याच्या मनाला वाटेल ती माहिती ब्रेकिंग न्यूज म्हणून ठोकून देणे सुरु होते. जरी डीटेल्स असले तरी ते दाखवणार नाहीच. एखाद्या घटनेचे पाच सहा मिनिटाचे फुटेज असेल तर फक्त तीन सेकंदाचे फुटेज रिपीट मारतात. ह्या चार ओळी आणि तीन सेकंदाचे फुटेज मागे व्यावसायिक गणित आहे. माणूस चॅनेल सर्फ करतो. एका चॅनेलवर किमान तीन सेकंद घालवतो, तेव्हड्यात काही लक्ष वेधून घेणारे दिसले तर थांबतो. मग ह्यांचा गारुड्याचा खेळ सुरु होतो. 'जीन्होने अभी अभी अपने टीवीसेट खोले है, उनको ये बात बता दे कि फलाना धिकाना हुवा है... ' अशा अगदी माफक स्वरुपात सर्फ करत आलेल्या प्रेक्षकाला गपकन धरण्याचा प्रकार सुरु झाला.

माणसाला दोन प्रकारच्या कथा आवडतात. एक फिक्शन आणि एक रिअल. खऱ्याखुऱ्या घटनांच्या बातम्या थ्रील देतात, किक देतात. खून, बलात्कार, भ्रष्टाचार, अपघाताच्या बातम्यांनी भावना उद्दीपित होतात. कथास्वरुपात मांडलेले घटनाक्रम फार लोकप्रिय आहेत. 'सावधान इंडिया, क्राईम पेट्रोल' इत्यादी. संपूर्ण काल्पनिक असलेल्या सीआयडीला प्रेक्षक डोक्यावर घेतात तिथेच संपूर्ण सत्य घटनेवर आधारित क्राईम पेट्रोलसुद्धा आवर्जून पाहतात. पण क्राईम पेट्रोल पाहताना हे माहित असते कि ही घटना प्रत्यक्षात घडलेली आहे. त्याचा मनावर वेगळा परिणाम होत असतो. 'इंडियाज मोस्ट वांटेड' हा पहिला कार्यक्रम असावा जो खऱ्या घटना नाटकीय पद्धतीने दाखवायचा. ह्या प्रोग्राम ला प्रचंड लोकप्रियता मिळाली. ह्यात फार काही सृजनात्मक करण्यासारखे नव्हते. उपलब्ध पोलीस रेकॉर्ड घेऊन त्यातले प्रसंग नाट्यरूपात दाखवायचे, बस.. लोकांना ह्यात मनोरंजन मूल्य सापडते. हेच मनोरंजन मूल्य घेऊन पत्रकारितेचे लायसन्स घेऊन वृत्तवाहिन्या खऱ्या बातम्या मनोरंजक पद्धतीने दाखवतात. त्यानंतर आला रिअल टाईम घटनांच्या बातम्यांचा काळ. ब्रेकिंग न्यूज म्हणजे काय? म्हणजे जे काही आतापर्यंत सुरु होते ते बदलले आहे. आज आत्ता ताबडतोब. आपल्या बोअरिंग रटाळ जीवनात असे धक्के थ्रीलचा अनुभव देतात.  बोरवेलमध्ये फसलेला मुलगा काढणे व त्याची 'पल पल कि खबर' मिळणे जनतेला टीवीच्या पडद्यावर चिकटवून ठेवू लागले. चालू घटनेतल्या थ्रीलचा जिवंतपणे उपभोग घेता येत होता. त्या एक विशिष्ट काळात बोरवेल मध्ये मुले पडणे ह्याची साथ आली होती. ती अपोआप होती? आता मुले पडत नाहीत? त्या आधी पडत नव्हती? गणपतीला दुध पाजणे हा एक प्रकार. मी तर बहुतांश वेळा बघितले आहे कि जी ब्रेकिंग न्यूज म्हणून एक्सक्लुजीव म्हणून बातमी दिली जाते, तिला खरेच काही मूल्य नसते. अगदी पंतप्रधानसारख्या मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीचा खून झाला तर काही महत्त्व. म्हणजे निश्चित आणि मोठी बातमी असेल तरच. 'ब्रेकिंग न्यूज, आताच हाती आलेल्या बातमीनुसार अर्थसंकल्पात सिगरेटवर कर वाढला असण्याची शक्यता आहे असे सूत्रांकडून कळले.' ही काय ब्रेकिंग न्यूज आहे का? ह्यात काहीही बातमीमूल्य नाही. पण भन्नाट काहीतरी सांगतोय असा देखावा निर्माण करणे. कोणा बाबाला स्वप्न पडले म्हणून पुरातत्व खात्याने जमीन खोदणे आणि टीव्ही ने त्याला लाइव दाखवणे ह्यात एक षड्यंत्र होते, प्रेक्षकांची परीक्षा घेणे सुरु होते..  भूतप्रेत, गाय, एलियन, ऑक्सिजन वगैरे. हळूहळू मनोरंजन आणि प्रोपागांडा ह्यातली सीमारेषा धूसर होत आता मनोरंजनातून प्रोपगंडा पेरायला सुरुवात झाली. नुकतीच एक व्हिडीओ क्लिप वायरल झालेली बघितली (जी खरेतर बरीच जुनी आहे) ज्यात शाहरुख ने पाकिस्तानी जळीत प्रकरणात देणगी दिली असे एक मिनिटाच्या क्लिप मध्ये होते. आता बघा, ती पूर्ण क्लिप सहा मिनिटांची होती. त्यात शेवटच्या मिनिटाला शाहरुखने अशी कोणतीच मदत केली नाही असे आम्हाला शाहरुख कडून कळते आहे असे सांगतात. पण पहिले पाच मिनिटे 'देणगी दिल्याचा मेसेज वायरल झाला आहे' हा मेसेज रंगवून रंगवून सांगतात. इतका कि कंटाळा येईल तोपर्यंत. अशाच रीतीने खऱ्या  बातम्या सांगण्याच्या निमित्ताने खोट्या सांगून टाकतात. 'सुत्रो के हवाले से' म्हटले कि झाले. अंगावर काही येत नाही.  representative image अशा नावाने एखादी image टाकायची संपादकीय पद्धत आहे. त्या नावाखाली फोटोशॉप image टाकून त्या image खऱ्या असल्याचा भास करून द्यायचा.. असले अनेक धंदे सराईतपणे सुरु आहेत. त्याविरुद्ध कोणीच काही करू शकत नाही. अपवाद फक्त सूचना आणि प्रसारण मंत्रालय.

न्यूज चॅनेलचे काही प्रकार आहेत. अनेक चॅनेल केवळ व्यापारक्षेत्राशी निगडित आहेत. पण शेअरमार्केट म्हणजेच ह्यांचे व्यापारउदिम आणि उद्योग. ह्यात कायमस्वरुपी शेअरबाजाराशी संबंधित बातम्या असतात. मार्केट सुरु असतांना लाइव रिपोर्टिंग आणि विश्लेषण, मार्केट संपल्यावर दिवसभर काय काय झाले त्याचे विश्लेषण. लोकांना आर्थिक साक्षर करण्याच्या, आर्थिक प्रश्न सोडवण्याच्या, गुंतवणूक करण्याच्या नावाखाली केवळ म्युच्युअल फंडच कसे योग्य आहे हे गळी उतरवणे असते. एसआयपी हाच कसा सर्वोत्तम मार्ग आहे ह्याची मार्केटिंग करणे. ह्या चॅनेल्सची ही म्युच्युअल फंड आणि शेअरब्रोकर्स फर्म्ससाठीची छुपी जाहिरातबाजीच आहे. तसेच क्रिडाक्षेत्र म्हणजे केवळ क्रिकेटचे सामने, सुरु होण्यापूर्वी, संपल्यावर त्यावरचे दोन दोन तासाचे विश्लेषण नमक गप्पांचे कार्यक्रम, त्याचा जरा TRP घसरू लागला तर क्रिकेटशी कोणताही संबंध नसलेल्या सुंदरींना कमी कपड्यात चर्चेला बसवणे... बाकी भारतीय खेळ, हॉकी, ऑलिम्पिकवाले खेळ सगळे अदृश्य. कला आणि मनोरंजनक्षेत्र म्हणजे केवळ बॉलिवूड, पेज थ्री पार्ट्या, सिनेमा लॉन्च, इत्यादी. इथुन हळुहळु सुरु झालेलं ते मालिकांचे, रिअलिटी शोचे, कॉमेडी शोचे  तुकडे दाखवणे, मालिका सिनेमातल्या नटनट्यांच्या मुलाखती, सेटवरचे प्रसंग दाखवणे इत्यादी. भारतीय लोककला, लोकसंगीत, शास्त्रिय संगित, लोकनृत्ये, चित्रकला, शिल्पकला आणि अशा ६४ कलांच्या प्रसाराचा भार केवळ सरकारी वाहिन्यांनी वाहायचा. त्याचा ह्या कमर्शियल चॅनेलवाल्यांच्या मनोरंजनक्षेत्रात समावेश होत नाही. कारण क्रिकेट-सिनेमा-मालिकांसाठी प्रेक्षक मिळवून द्यायची सुपारी ह्यांनी घेतली आहे.

"आजच्या ठळक बातम्या, दिनभर कि खबरे कुछ इस प्रकार है" असे शांततेत न्यूज वाचता वाचता न्यूज अ‍ॅन्कर पत्रकार कधी झाले ते कळलेच नाही. पूर्वी अ‍ॅन्कर फोनलाईन वर असलेल्या संबंधित व्यक्तीकडून किंवा स्टुडीओत बोलावून त्या विशिष्ट विषयावर त्या व्यक्तीचे (तज्ञ किंवा संबंधित जसे कि पोलीस अधिकारी, पदाधिकारी, राजकीय नेता, इत्यादी) काय मत आहे हे प्रेक्षकांना ऐकवायचा. कारण अ‍ॅन्करचे काम केवळ बातम्या सादर करणे इतकेच होते. फॅशन शोमध्ये मॉडेल्स जशा फॅशन डिझाईनरच्या कलाकृती दाखवण्यासाठी कॅटवॉक करतात तसे अ‍ॅन्करचे काम असायचे. दोन पाहुण्यात परस्परविरोधी मतांवर चर्चा व्हायच्या म्हणजे अ‍ॅन्कर प्रश्न मांडून पाहुण्यांना बोलू द्यायचा. नंतर त्यांच्यात जुगलबंदी लावून रेफ्री सारखे काम अ‍ॅन्कर करू लागले. आता अ‍ॅन्कर स्वत:च एक बाजू घेऊन दुसऱ्या बाजूच्या पाहुण्याला शाब्दिक ठोसे लगावून 'मेरी गली में मैच शेर' करत असतो. हे लोकांना आवडते. अर्णवने कन्हैया आणि उमर ला स्टुडीओत बोलावून पत्रकारितेवर जो बलात्कार केला, त्यादिवशी विशिष्ठ लोकांना झालेला आसुरी आनंद मला अजून लक्षात आहे. इथून सर्व काही ज्या भयंकर पद्धतीने बदलले ते कायमचेच.

गेल्या कित्येक महिन्यांपासून रविश कुमार टीव्ही देखना छोड दिजीये असे आर्जव करत आहे. त्यामागे हा सगळा इतिहास आहे. भारतीय जनतेभोवती न्यूज चॅनेलच्या माध्यमातून एक मजबूत सापळा रचला गेला आहे. तो हळूहळू करकचून आवळण्यास सुरुवात होईल. किंबहुना झालीही आहे. मिडिया पूर्वी सूक्ष्मपणे जनतेचे मानस बदलण्याचे काम अगदी घाबरून घाबरून करत असे. कारण असे करण्यास विरोध करणारेही मीडियात होते. आता अशा विरोधास संपवणे सोपे झाले आहे. आणि भारतीय प्रेक्षक तिसऱ्या वर्गाच्या बुद्धीचा असल्याने विचारांवर नियंत्रण मिळवण्याचे काम उघडउघड व राक्षसी पद्धतीने होत आहे.

हा एक मानसशास्त्रीय सापळा आहे. मनुष्याच्या मनात नैसर्गिकरित्या काही पूर्वग्रह असतात. माणूस आपल्या मेंदूचा वापर करून तार्किकपद्धतीने निर्णय घेतो हे शंभर टक्के खरे नाही. समोर आलेली माहिती खरी कि खोटी ह्याची शहानिशा करायची बहुतांश लोकांची मानसिकताच नसते. मनुष्य त्याच्यासमोर सातत्याने येणाऱ्या एखाद्या माहितीला खरे मानू लागतो.  एकच बाजूचे विचार सातत्याने ऐकत राहिल्याने तेच खरे आहेत असे मानतो. इतर लोक काय करत आहेत ते बरोबर असेल म्हणून तेच फॉलो करू लागतो. 'Types of Biases and examples' असे गुगल सर्च करा आणि मनुष्याचे मन किती भोळे असते  ते बघा. त्या सर्वांची चर्चा ह्या लेखात अशक्य आहे. सामान्य माणसाच्या ह्या अगतिकतेचा फायदा उचलून त्याला भ्रामक जगात जगायला भाग पाडणे मीडियाद्वारे सुरु आहे. मिथक आणि सत्य ह्यातली सीमारेषा जाणवूच नये इतक्या पातळीवर हे षड्यंत्र पोचले आहे. न पचणारे सत्य पुढ्यात आल्यावर त्यावर अविश्वास दाखवणे, आवडते असत्य कवटाळून घेणे हा स्वभाव बनला आहे. ह्याच मानसिकतेच्या भरवश्यावर आपले विद्यमान पंतप्रधान दरदिवशी एक नवीन खोटे बोलून छातीठोकपणे निभावून नेतात. त्यांना ही हिम्मत त्यांच्या हातातल्या सत्तेने दिली आहे. माध्यमांच्या आजवरच्या वाटचालीने दिली आहे. आज हे बहुसंख्य जनतेच्या मनात कोणतीही आयडिया पेरू शकतात. अविचारी झुंडीने घेतलेले कित्येक निष्पाप लोकांचे प्राण हे त्याचे जिवंत उदाहरण आहे. सामान्य माणसातला पशु जागा करण्याचे काम पूर्णत्वास येत आहे. आता त्या पशुला विरोधी मतांच्या लोकांचा नायनाट करा अशा उघड उघड सूचना दिल्या जात आहेत. 

अशा अवस्थेत लोकशाहीचा बळी जाणे अगदी क्षुल्लक गोष्ट आहे. एखाद्या व्यक्तीने स्वत:हून तंत्र ताब्यात घेण्यापेक्षा लोकांनी आपणहून त्याच्या ताब्यात देणे जास्त भयावह असते. जर्मनीचे उदाहरण ह्यासंदर्भात नेहमीच दिले जाते. माझ्या मते रवांडा देशातले जिनोसाईड + चीनमधले कल्चरल रीवोल्युशन + जर्मनीचे नाझीकरण अशा तिन्ही प्रकारचे भवितव्य एकत्रितपणे देशासमोर मांडले जात आहे. ह्यात जे भरडले जाणारे सामान्य लोक तेच असतील ज्यांनी हा प्रकार आजवर वाढू देण्यात सहभाग दिला किंवा त्याकडे दुर्लक्ष केले. आपल्या धर्माचे राज्य ह्या देशावर आले म्हणजे आपल्या परिस्थितीत बदल घडणार नाही हे सगळा विध्वंस झाल्यावर त्यांना कळेल. पण उपयोग नाही. धर्माचे ठेकेदार जेव्हा ह्यांच्यावर अत्याचार करू लागतील आणि मग दाद मागायची तरी कोणाकडे असा प्रश्न उभा राहील तेव्हा लोकशाही गमावल्याचा पश्चाताप कोणतेही प्रायश्चित्त घेऊन संपणार नाही.

उपाय काय? फार सोपे उपाय आहेत. प्रश्न विचारा. प्रश्न विचारण्याआधी कोणत्याही माहितीला दुसऱ्या बाजू असू शकतात त्याचा किमान विचार करा. माहिती पडताळून पहा. अगदी सोपे म्हणजे दिलेल्या आश्वासनांची पूर्तता कितपत झाली तेवढे शोधा. बेरोजगार, शेतकरी, उद्योजक, सामान्य लोक ह्यांचा खऱ्या समस्या कितपत खरोखर संपल्या, त्यावर कितपत काम झाले ते बघा. एखादी बातमी ऐकून, एखादे भाषण ऐकून आपल्या भावना तीव्र होतात का ह्याकडे लक्ष ठेवले तरी बरेच सांभाळता येते. आपला पार चढतो, तोंडातून अपशब्द निघतात का हे बघितले कि समजायचे कुठेतरी काहीतरी हुकते आहे. कोणाच्याही कोणत्याही दाव्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका.  दिशाभूल करणारे सर्वे, खोट्या आकृत्या, खोटे तक्ते ह्याच्यावर हुरळून जाऊ नका. खोट्या बातम्या शेअर करू नका. तुम्ही शेअर करता म्हणजे तुम्ही त्याची खातरजमा केली आहे, तुमचा त्याच्यावर विश्वास आहे म्हणून तुम्ही ते शेअर केले आहे असे तुमचा मित्र, नातेवाईक समजतो. त्याचा तुमच्यावर विश्वास असतो, त्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन तुमच्या हाताने खोट्या बातम्या पसरवल्या जातात. 

एवढे छोटे उपाय केलेत तरी हा भारत आपला फार उपकृत राहील. येत्या पिढ्यांना सुखाचा श्वास घेता येईल. त्यांना मुठभर बदमाश लोकांच्या सापळ्याचे शिकार होऊ न देणे हे आपल्याच हाती आहे. हां, हा माझा लेख नक्की शेअर करा. तुमच्या नावासकट करा, बिननावाचा करा. काही हरकत नाही.